भारतीय लष्कराने फाडला पाकिस्तानचा बुरखा   

‘ऑपरेशन सिंदूर’ तोलून मापून दिलेले उत्तर : मिस्री  

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ हे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला ‘तोलून मापून दिलेले’ उत्तर असल्याचे परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिस्री यांनी बुधवारी सांगितले. पहलगाम हल्ल्याला उत्तर देणे हा आमचा अधिकार असून, त्याचा आम्ही वापर केला आहे. आम्ही अतिशय जबाबदारीने ही कारवाई केली, असेही ते म्हणाले.
 
’ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केल्यानंतर काही तासांतच परराष्ट्र सचिवांनी राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी कर्नल सोफिया कुरैशी, कमांडर व्योमिका सिंह उपस्थित होत्या. या कारवाईची माहिती देतानाच  पाकिस्तानचा बुरखा जगासमोर उघड केला. 
 
भारताने प्रथमच थेट कारवाई केली आहे. याआधी, २०१६ आणि २०१९ मध्ये भारताने व्याप्त काश्मिरात कारवाई केली होती.२२ एप्रिल रोजीच्या हल्ल्यातील हल्लेखोरांना आणि त्यांच्या पाठिराख्यांना न्याय मिळवून देणे आवश्यक होते. त्यामुळे पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तानकडून भारताविरुद्ध आणखी हल्ले होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
 
प्रत्युत्तर देणे आणि सीमापार हल्ले रोखण्याचा आम्हास अधिकार असून आम्ही तो वापरला आहे. पहलगाममधील हल्ल्यास १५ दिवस उलटले. तरीदेखील पाकिस्तानने त्यांच्या हद्दीतील दहशवादी तळांवर कोणतीही कारवाई केली नाही. याआधी, आम्ही वारंवार पाकिस्तानकडे दहशतवादी तळांची यादी सोपविली. दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी चालू शकत नाही, असेही बजावले होते, असेही ते म्हणाले.
 
२६/११ नंतर भारतावर झालेला हा मोठा हल्ला होता. पहलगाममधील हल्ला अत्यंत क्रूरतेने करण्यात आला. पर्यटकांना कुटुंबासमोर डोक्यात गोळ्या घालून मारले गेले होते, असेही त्यांनी सांगितले.जम्मू-काश्मीरमधील शांतता आणि विकास दहशतवाद्यांना नको आहे. मागील वर्षी जम्मू-काश्मीरला २ कोटी पर्यटकांनी भेट दिली होती. त्यामुळेच हा हल्ला करण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. रात्री १ वाजून ०५ मिनिटांपासून ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ९ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. पहलगाम हल्ल्यात झालेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर भारतीय सशस्त्र दलाने हाती घेतले. या ऑपरेशनमध्ये कुठेही निर्दोष नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेतली गेली, अशी माहिती भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरैशी यांनी दिली.
 
भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरैशी पुढे म्हणाल्या, ऑपरेशन सिंदूर २२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना न्याय देण्यासाठी घेतले गेले. या कारवाईत ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. मार्च २०२५ मध्ये जम्मू काश्मीर येथे ४ जवानांची हत्या केली होती. त्या दहशतवाद्यांना पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर प्रशिक्षण दिले होते. मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी दहशतवादी तळांनाही ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये लक्ष्य करण्यात आले.
 
मरकज सुभानअल्लाह जैश ए महमदचे मुख्यालय होते. याठिकाणीही दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये कुठल्याही सैन्य ठिकाणांना लक्ष्य केले नाही, कुठल्याही नागरिकाला इजा झाली नाही. मागील ३ दशकांपासून पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत आहे. तिथे दहशतवादी तळ आणि प्रशिक्षण केंद्र बनवले होते. उत्तरेकडील सवाई नाला आणि दक्षिणेकडील बहावलपूर येथे जे आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी अंतरावर आहे. तिथेही भारतीय सैन्याने हल्ला केला, असे कर्नल कुरैशी यांनी सांगितले.
 
हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह यांनीही पत्रकार परिषदेला संबोधित करत हल्ल्याची माहिती दिली. गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर आखण्यात आले. 
 
पाकिस्तानच्या मुजफ्फराबाद येथील लष्करच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी याच ठिकाणी प्रशिक्षण घेतले होते. दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी भारताने ही कारवाई केली. बरनाला कॅम्प, सियालकोट येथील महमूना कॅम्प नष्ट करण्यात आले आहे, असे व्योमिका सिंह यांनी सांगितले. 
 

Related Articles